बेळगांव:अनेक वेळा तक्रार करून देखील कामकाजाची दखल घेतली नसल्याने हलगावासीयांनी अलारवाड सर्कल येथे आंदोलन केले आणि आपली मागणी पूर्ण व्हावी याकरिता निदर्शने केली.. गेल्या सहा वर्षांपासून अलारवाड ब्रिज सर्कलची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. येथील ब्रिज गेल्या सहा वर्षांपासून दुरावस्थेत आहे त्यामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याठिकाणी अनेकांचा अपघात देखील झाला आहे त्यामुळे येथील ब्रिज सर्कलचे तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी हलगा येथील जिजाऊ महिला मंडळ हलगा ग्रामस्थ आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यातर्फे आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
येथील अलारवाड सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत तसेच येथील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली नसल्याने अनेकांना अपघाताला तोंड द्यावे लागत आहे तसेच छोटे-मोठे अपघात देखील घडले आहेत. इतकेच नाही तर या ठिकाणी गतिरोधक नसल्याने देखील समस्या निर्माण झाली आहे तसेच या ठिकाणी सिग्नल व्यवस्था देखील नाही त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.
अनेक वेळा तक्रार करून देखील या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे हलगा ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी येथील सर्कल मध्ये आंदोलन करून निदर्शने केले आणि येथील रस्त्याची तात्काळ डागडूजी तरी करण्यात यावी अशी मागणी केली.