नवी दिल्ली, ता. ३१ : केंद्रातील मोदी सरकारचा या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आज (ता. १) संसदेत सादर होणार आहे. लोकसभा निवडणुका होईपर्यंतच्या खर्चाला मंजुरी देणे, हा अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश असला तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या पेटाऱ्यातून काय काय बाहेर काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शेतकऱ्यांना दरवर्षी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळत आहे.अंतरिम अर्थसंकल्प असल्याने फार मोठ्या घोषणा केल्या जाणार नसल्याचा अंदाज असला तरी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकप्रिय घोषणा केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे याहीवेळा सरकार तो मोह टाळणार नाही, असे मानले जात आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सरकारकडून प्राप्तीकर सूट मर्यादा वाढविण्यात आली होती, तर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती.