बेळगाव : अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून अयोध्येला जाण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. शहर आणि परिसरातून विविध धार्मिक स्थळांना यात्रांचे आयोजन करणाऱ्या टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे मार्च, एप्रिल व मे महिन्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे. त्यामुळे अनेक टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बुकिंग हाऊसफुल झाल्याची माहिती दिली.
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यापासून शहर आणि परिसरातील नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांना रामलल्लाच्या दर्शनाची आस लागून आहे. दरवर्षी काश्मीर, लेह, लडाख, कुल्लू, मनाली, हिमाचल प्रदेश, चारधाम, तिरुपती, रामेश्वर, अष्टविनायक दर्शन यांसह इतर ठिकाणी यात्रांचे आयोजन करणाऱ्या टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांनी यंदा अयोध्येला जाण्यासाठी भाविकांची गर्दी पाहून अयोध्या दर्शनासाठी विशेष यात्रांचे
आयोजन केले आहे. त्यामुळे उन्हाळी सुटीत कुटुंबांसह नागरिकांनी अयोध्येला जाण्यासाठी बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांसह रेल्वे आणि विमानाचे बुकिंगही जोरात सुरू आहे.
अयोध्येमध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी गर्दी टाळावी, असे आवाहन सातत्याने केंद्र सरकारतर्फे केले जात आहे. मात्र, लोक अयोध्येला जाण्यास पसंती देऊ लागले आहेत. अनेक यात्रा कंपन्यांनी मार्च, एप्रिल व मे महिन्यांतील इतर ठिकाणांच्या सहलींचे नियोजन रद्द करून अयोध्या व उत्तर प्रदेश आणि दिल्ली परिसरातील विविध पर्यटन स्थळांचे पॅकेज तयार केले आहे.