गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत गणेश भक्तांनी मंगळवारी गणपती बाप्पांना निरोप दिला. गेल्या दहा दिवसांच्या मुक्कामाच्या नंतर वर्षभरासाठी निरोप घेत असलेल्या गणपती बाप्पांना निरोप देताना अनेकांचे अंतःकरण जड झाले होते.कपिलेश्वर तलावात सगळ्यात पहीलेंदा माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन केले.दुपारी अडीच वाजता पहिल्या गणरायाचे विसर्जन करून माळी गल्ली गणेशोत्सव मंडळाने इतर मंडळांना देखील आदर्श घालून दिला.
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सकाळपासून घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन विविध ठिकाणी सुरू झाले होते. तर सार्वजनिक गणेशोत्सवाची भव्य मिरवणूक सायंकाळी हुतात्मा चौक येथून सुरू करण्यात आली. ढोल-ताशे व अन्य पारंपारिक वाद्यांच्या जल्लोषी वातावरणात सुमारास सुरू झालेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली होती.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध बँड पथकांनी आणि झांज पथकांनी सादरीकरण करून गणेश भक्तांची दाद मिळवली.कपिलेश्वर आणि जक्किनहोंड तलावात श्री मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. अनगोळ आणि जुने बेळगाव येथील तलावाच्या ठिकाणीही श्री मूर्ती विसर्जनासाठी गर्दी झाली होती.
श्री विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ हुतात्मा चौक येथून करण्यात आला .संयुक्त महाराष्ट्र चौक येथील राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाचा गणपती मिरवणुकीत अग्रभागी होता. श्री गणेशाचे पूजन महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, आमदार अभय पाटील, माजी आ. महांतेश कवटगीमठ , आमदार राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन , पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर आणि मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीच्या मार्गावर फुल व्यापारी एम गोविंदन यांच्या तर्फे एकशे एक श्रीफळ वाढवून गणरायाला वंदन करण्यात आले. श्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर गणेश भक्तांनी गर्दी केली होती.संपूर्ण शहरात पोलीस खात्यातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.