दि.8 सप्टेंबर या दिवशी मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये 'जागृती मंचतर्फे 'आरोग्य भान-किशोरावस्था: वाढ व विकासाचा टप्पा 'इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना समजावण्यात आला. यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी असलेल्या आणि सध्या शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ कीर्ती अभय बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वयानुसार होणारी वाढ, मासिक ऋतुचक्र, हा प्रवास आनंददायक कसा बनवावा? यासारख्या
काही प्रश्नांवर प्रकाश पाडण्यात आला. किशोरावस्था म्हणजे साधारणपणे १० ते १९ वर्षांचा काळ असून हा बालपण आणि प्रौढत्वाच्या मधला महत्त्वाचा टप्पा आहे. या वयात मुला-मुलींच्या शरीरात हार्मोनल बदलांमुळे उंची, वजन आणि शारीरिक रचनेत झपाट्याने बदल होतात. शारीरिक बदलांसोबतच मानसिक पातळीवर तीव्र भावनिक चढ-उतार, चिडचिड आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची ओढ निर्माण होते. या काळात मुले पालकांपेक्षा मित्र-मैत्रिणींच्या संगतीला जास्त महत्त्व देतात, ज्यामुळे या वयाला वादळ आणि संघर्षाचा काळ मानला जातो ,डाॅ.कीर्ती बिर्जे यांनी पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना समजावले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका तसेच जागृती मंच प्रमुख नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर,शेती प्रमुख अरूण बाळेकुंद्री, शिक्षक गजानन सावंत, स्नेहल पोटे, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.सातवीची विद्यार्थिनी तन्मयी पावले हिने आभार मानले.
