बेळगाव : तालुक्यातील खानगाव येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुशांत बाळेश कणबरकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, खानगाव येथे जमिनीच्या संदर्भातून सुरू असलेल्या वादातून संबंधित व्यक्तींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत जाऊन हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेप्रकरणी सीद्राय परशुराम कणबरकर, महेश सीद्राय कणबरकर, रोहित सीद्राय कणबरकर, एका नगरकर, रेणुका सीद्राय कणबरकर आणि बन्नू पाटील यांनी सुशांत बाळेश कणबरकर व बाळेश कणबरकर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारामारीत सुशांत कणबरकर जखमी झाले.
जखमी सुशांत यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतची पुढील माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
