बेळगाव :
कन्नड भाषेच्या सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषिकांना संविधानाने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी कन्नड सक्तीचा निषेध नोंदवला. गेल्या काही महिन्यांपासून कन्नड भाषेच्या सक्तीविरोधात समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पोलिस प्रशासनाकडून मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
व्यापारी आस्थापनांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप समितीच्या नेत्यांनी केला. तसेच सरकारी कार्यालये, परिवहन व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या फलकांमुळे मराठी भाषिकांसह इतर नागरिकांना अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनांनंतरही मराठी भाषेत परिपत्रके उपलब्ध करून दिली जात नसल्याची तक्रारही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर नागेश सातेरी, मालोजी अष्टेकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
