खानापूरमध्ये थरार! अस्वलाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जीव धोक्यात
जनावरे चारायला जंगलात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील जंगलात ही घटना घडली.झाडावर चढून शेतकऱ्याने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
हुळंद गावातील शेतकरी महेश गावडे (25) हा रोजच्या प्रमाणे जंगलात जनावरांना चरण्यास घेऊन गेला होता. जंगलात जनावरे चरत असताना अचानक महेश समोर अस्वल आले. प्रसंगावधान राखून महेशने बाजूच्या झाडावर चढून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण अस्वल देखील त्याच्या बरोबर झाडावर चढले आणि त्याचा चावा घेतला. अस्वलाने पायावर हल्ला केल्याने पायाला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. यावेळी जंगलातून जाणाऱ्या अन्य शेताकऱ्यांनी महेश जखमी अवस्थेत पडल्याचे पाहिले आणि वन खात्याला कळवले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने महेश याची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर बेळगाव मधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
