साऊथ कोकण एम्पावरमेंट चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने पीयूसी द्वितीय वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून भूगर्भशास्त्र व खनिज विभागाच्या प्रमुख श्रीमती बिंदन पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. प्रभू होते. व्यासपीठावर अनिल चौधरी, लता किट्टूर आणि मदन कलबुर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी अमूल्या आणि कुमारी वैष्णवी यांच्या स्वागतगीताने झाली. प्राचार्य एस. एन. देसाई यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत केले. मान्यवरांचा परिचय डॉ. कीर्ती फडके यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार एस. वाय. प्रभू यांनी, तर इतर मान्यवरांचा सत्कार लता किट्टूर यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती बिंदन पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनात संघर्ष, एकाग्रता आणि चिकाटी यांचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने आपल्या कलागुणांना वाव देत ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिला श्री रामनाथकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच लेट रुस्तुम धाराशॉ रुतोनजी पारितोषिक अंतर्गत तनिष्का नावगेकर, रिया राऊत आणि खुशी लदवा यांना रोख पारितोषिक देण्यात आले.
फाऊंडेशनच्या वतीने विज्ञान शाखेतील तनिष्का नावगेकर, रिया राऊत, खुशी लदवा, श्रद्धा ढवळे आणि आदित्य पालेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
याशिवाय आरपीडी पीयू कॉलेजच्या कला शाखेतील साची प्रभूखानोलकर, बसवराज कुपाणी, नागलक्ष्मी हुरक्की, सेजल उप्पीण आणि प्रांजली कणबरकर तसेच वाणिज्य शाखेतील कौस्तुभ अरलीकटी, दीपा दासण्णावर, आसमान कांबळे, स्नेहा हुडेद, राणी कुंडलकर आणि स्वानंद निबाळकर यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
विविध विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत पालक आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
समारोपप्रसंगी अध्यक्ष एस. वाय. प्रभू यांनी विद्यार्थ्यांना चिकाटी, मेहनत आणि सातत्याच्या बळावर मोठे यश मिळविण्याचा संदेश देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कीर्ती फडके यांच्या समूहाने केले, तर प्रा. आर. ए. सपले यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
