बेळगाव : डी मीडिया
शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन आणि जमिनीचे आरोग्य टिकवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
गोकाक शहरातील हिल गार्डन येथे कृषी विभाग आणि जलसंधारण विकास विभागाच्या वतीने रिवार्ड आणि आत्मा योजनेंतर्गत आयोजित ‘एलआरआय यात्रा’ आणि ‘खेत बचाव’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते जनजागृती वाहनाला हिरवा झेंडा दाखवून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी पद्धतींचा स्वीकार करण्यासोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यावर भर द्यावा. मातीची सुपीकता वाढवणे, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा वापर काळाची गरज आहे.
‘एलआरआय यात्रा’ आणि ‘खेत बचाव’ अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षण, जमिनीची गुणवत्ता सुधारणा, जलसंधारण, धूप रोखणे आणि शाश्वत शेतीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत विविध गावांमध्ये प्रशिक्षण शिबिरे, जागृती कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
