किल्ला तलावाची अमान सेठ यांच्याकडून पाहणी; प्लास्टिक कचऱ्यावर चिंता
बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सैत यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह किल्ला तलाव परिसराची पाहणी करून प्लास्टिक कचऱ्यामुळे तुंबलेल्या नाल्यांची आणि जलनिस्सारण व्यवस्थेची पाहणी केली.
पाहणीदरम्यान तलाव आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, रस्ते जलमय होणे आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुंबलेले नाले तातडीने साफ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
https://youtube.com/shorts/ElhA3bqbQW4?si=Dqph9QHtTA0q91Eu
यावेळी अमान सेठ यांनी नागरिकांना आवाहन करत प्लास्टिक व इतर कचरा नाले, तलाव आणि पाण्याच्या प्रवाहात टाकू नये, असे सांगितले. निष्काळजीपणे टाकला जाणारा कचरा जलनिस्सारण व्यवस्था विस्कळीत करतो, परिणामी पाणी तुंबते, पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि घरे, रस्ते तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी नमूद केले.
महापालिका प्रशासन नाले स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असले तरी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. स्वच्छता राखणे आणि योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी सर्वांनी मिळून स्वच्छ आणि पूरमुक्त बेळगाव घडविण्याचे आवाहन केले.
या पाहणीवेळी महापालिकेचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि परिसरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
