गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात पुन्हा पावसात खंड पडल्यास आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाची कमतरता आणि दुष्काळाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता जिल्हाभर पावसाला सुरुवात झाल्याने परिस्थितीत सुधारणा होत आहे.
येत्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे, यावर्षी जिल्ह्यात खतांचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला. मागील वर्षी खतांच्या कमतरतेमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदा केंद्र सरकारकडून पुरवठा मर्यादित ठेवण्याचे आवाहन असले तरी राज्य आणि जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना हट्टीहोळी म्हणाले की, SIR प्रक्रिया पूर्ण होताच ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
सध्या ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासकांकडून सुरळीतपणे सुरू असून, काही ठिकाणी किरकोळ अडचणी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
