बेळगाव : श्री विश्वकर्मा सेवा संघ, बेळगाव यांच्या वतीने सातवी, दहावी आणि बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विविध शैक्षणिक स्तरांवर उत्कृष्ट गुण मिळवलेल्या एकूण 86 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करताना समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे कृष्णा सुतार आणि सचिन सुतार उपस्थित होते. प्रमुख वक्ते शशिकांत सुतार यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. मोबाईलचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञानवृद्धीसाठी आणि अभ्यासासाठी करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच यश मिळवण्यासाठी वेळेचे नियोजन आणि शिस्तबद्ध अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्री विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर आणि श्री विश्वकर्मा सेवा महिला संघाच्या अध्यक्षा गीता सुतार यांनी संघाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात केवळ विश्वकर्मा समाजातीलच नव्हे तर इतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी नामदेव लोहार, वैजनाथ लोहार, प्रशांत बेळगावकर, संदीप मडोळकर, प्रकाश कम्मार, वासुदेव बडगेर, सोमशेखर सुतार, गोपाल लोहार, दिनेश सुतार, फोडू सुतार, श्रीधर लोहार, किरण सुतार, प्रदीप कम्मार, मारुती सुतार, विनायक लोहार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
