पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांवर गंभीर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याला तातडीने दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने सरकारकडे केली आहे. यासंदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संयुक्त कृषी संचालक एच. डी. कोळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात पावसाअभावी बाधित झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार बियाणे आणि खतांचा पुरवठा व्हावा, निकृष्ट दर्जाचे बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना शासनाने योग्य हमीभाव निश्चित करून त्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. कृषी क्षेत्रातील वाढत्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या शिष्टमंडळात माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोड्डगौडर, अरविंद पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बुदिहाळ यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
