बेळगाव
“भात जास्त शिजलेला का दिला?” या कारणावरून धाब्यात झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झालेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगतीमुळे दुसरे जेएमएफसी न्यायालयाने हा निर्णय दिला.
या प्रकरणातील आरोपी सिद्धाप्पा चांगाप्पा तुडयेकर (वय 35, रा. राजहंसगड, ता. बेळगाव) याच्याविरोधात बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी बाळासाहेब दिनकर देसाई आणि मारुती रामा पाटील हे देसूर-नंद्दीहळ्ळी रोडवरील राजहंस फोर्ड धाब्यावर स्वयंपाकी आणि वेटर म्हणून काम करत होते. 8 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री आरोपी जेवणासाठी धाब्यावर आला होता.
जेवणादरम्यान भात जास्त शिजल्याची तक्रार करत आरोपीने कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप होता. त्यानंतर शिवीगाळ करत लाकडी काठीने दोघांवर हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवले आणि जखमींना उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली होती.
तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये तफावत आढळल्याने न्यायालयाने आरोपीला संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणात आरोपीच्या बाजूने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी बाजू मांडली.
