मोबाईलच्या किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चिक्कबुदनूर गावातील लक्ष्मी मंदिराच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी घडली.
या घटनेत फकीरप्पा पेड्डेन्नावर (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फकीरप्पा हे मंदिराच्या परिसरात विश्रांती घेत असताना त्यांचा मित्र मल्लिकार्जुन पूजेरे तेथे आला. त्याने आपला मोबाईल परत देण्याची मागणी केली.
मात्र, फकीरप्पा यांनी मोबाईल तात्काळ न देता रात्री देतो, असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या मल्लिकार्जुनने मंदिरात कापूर प्रज्वलित करण्यासाठी वापरला जाणारा दगड उचलून फकीरप्पा यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात फकीरप्पा गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
