बेळगाव : कर्नाटक सरकारच्या मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यभर सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण २२ सप्टेंबरपासून ९ ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते व विधान परिषद सदस्य एम. जे. मुळे यांनी मराठा बांधवांना आवाहन केले आहे की, समाजाच्या हितासाठी प्रत्येकाने या सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन योग्य नोंदणी करावी.
आज सकल मराठा समाज व क्षत्रिय मराठा परिषद, बेळगाव यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मुळे म्हणाले की, नमुना फॉर्म भरताना धर्माच्या कॉलममध्ये “हिंदू”, जातीच्या कॉलममध्ये “मराठा”, पोटजातीच्या कॉलममध्ये “कुणबी” आणि मातृभाषेच्या कॉलममध्ये “मराठी” अशी नोंद करणे आवश्यक आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, हे सर्वेक्षण फक्त चार प्रश्नांपुरते मर्यादित नसून एकूण ६० प्रश्नांद्वारे समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक चित्र समोर येणार आहे. यात घरातील सुविधा, शिक्षणाची पातळी, व्यवसाय, उत्पन्न, ग्रामीण-शहरी स्थिती आदी घटकांचा समावेश असेल. सर्वेक्षणाच्या गुणांकन पद्धतीत ३ सामाजिक, २ शैक्षणिक आणि १ आर्थिक या प्रमाणावर मूल्यांकन होईल. ५० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यास समाज मागासवर्गीय श्रेणीत गणला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.
मुळे यांनी सांगितले की, “आम्ही समाजाची लोकसंख्या ४० लाख आहे असे मानतो. मात्र, विविध अहवालांमध्ये ही संख्या खूपच कमी दाखवली गेली आहे. यावेळी प्रत्येकाने योग्य माहिती भरल्यास खऱ्या संख्येचे प्रतिबिंब सरकारपुढे मांडता येईल आणि समाजाला शैक्षणिक व शासकीय सवलती मिळवून देता येतील.”
या पत्रकार परिषदेस माजी आमदार अॅड. अनिल बेनके, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, मराठा नेते किरण जाधव ,नागेश देसाई, धनंजय जाधव, युवराज जाधव, क्षत्रिय मराठा परिषदेचे श्यामसुंदर गायकवाड, वैभव कदम यांसह मराठा समाजाचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.
https://youtube.com/shorts/Ob9C9JQvfww?si=9UC97ONPSBE8ljiN
Also read









