बेळगाव शहरातील एपीएमसी फळबाजार परिसरात अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखेने (CCB) धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 24.80 ग्रॅम हेरॉईन, एक मोबाईल फोन आणि मिळून 5 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात महादेव गजानन पाटील (वय 28, कंग्राळी के.एच.) आणि विनायक बाळू खंडाळे (वय 25, कंग्राळी के.एच.) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एपीएमसी फळबाजारातील सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची वाहतूक करत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 4 लाख 96 हजार रुपयांचे 24.80 ग्रॅम हेरॉईन तसेच 5 हजार रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल जप्त केला आहे.
प्राथमिक तपासात आरोपींना मुंबईतील 'अम्मा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका महिलेने हेरॉईनचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यातील कलम 8(C) व 21(B) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई CCB चे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
