बेळगाव - येथील नाथपंथी रावळ समाजाच्या वतीने रविवार दिनांक ५ जुलै रोजी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.नाथ पै चौक शहापूर खडेबाजार येथील श्री अंबाबाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील नाथपंथी रावळ समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हिंदू धर्मात मोक्षप्राप्तीचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या नवनाथांचे आगळे वेगळे महत्त्व विशद करण्यात आले आहे. नवनाथांच्या आचार विचार आणि विविध धार्मिक विधी विधानांचे अनुसरण करणारा रावळ समाज संपूर्ण देशभरात विखुरलेला आहे. नाथपंथी,रावळ,रावळभिल्ल,भिल्ल, हणगी,कपाली, शिवजोगी,बळेगार,बुवा, डवरी,जोगी इत्यादी अनेक जातीत समाज विखुरला गेला आहे. काळाच्या ओघात हा समाज सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्ट्या मागे राहिलेला आहे. हा समाज पारंपरिक व्यवसाय सांभाळत उदरनिर्वाह करत आहेत कर्नाटकामध्ये रावळ समाज मागासवर्गीय अल्पसंख्यांक मध्ये समाविष्ट आहे.सरकारी नोंदणी नुसार समाजाचा शैक्षणिक टक्का अवघा 0.5% इतका आहे. एकेकाळी अत्यंत बलशाली मानला गेलेला रावळ समाज जातीत विभागल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.
विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या ध्येयाने बेळगावातील नाथपंथी रावळ समाजाने तीन राज्यांच्या रावळ समाजातील मान्यवरांचे संमेलन बेळगाव येथे रविवारी आयोजित केले आहे.शहापूर येथील नाथ पै चौक येथे असलेले प्राचीन श्री काळभैरवनाथ मंदिर नाथपंथी रावळ समाजाचे केंद्र स्थान आहे. या मंदिराची ख्याती बेळगाव पंचक्रोशीत पसरली आहे.
श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्ट वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी होणाऱ्या या संमेलनात समाजाच्या हिताच्या दृष्टीने ठराव केले जाणार आहेत. मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.या संमेलनाच्या तयारीसाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी जोरदार तयारी चालविली आहे.
