रविवारी दुपारी अहमद आपल्या घराजवळील गल्लीत खेळत असताना अचानक सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी बालकाला फरफटत नेऊन चावा घेतल्याने त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या.
घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन बालकाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर आझाद नगर परिसरात नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेळगाव शहर व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, महापालिकेकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे अनेक भागांत लहान मुले, विद्यार्थी व महिलांसाठी घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, प्रशासनाकडून केवळ कागदी उपाययोजना होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, महापालिका व प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी जोरदार मागणी होत आहे.
Also read









