बेळगाव : शहरातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी चार ते पाच इंचांपर्यंत खोल खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातांचा धोका वाढला असून अनेक वाहनांचे नुकसानही होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
शहरात हजारो खड्डे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, पावसाळ्यामुळे ही समस्या आणखी तीव्र झाली आहे. विशेषतः रामदेव गल्लीसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विशाल देशपांडे यांनी प्रशासनावर सवाल उपस्थित केला आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे कारवाई केली जाते, मात्र हेच कॅमेरे रस्त्यांवरील धोकादायक खड्डे प्रशासनाच्या नजरेस का आणत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
