बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीच्या खोऱ्यातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी सकाळी घटप्रभा परिसरातील धुपदाळ जलाशयाची पाहणी करून जलसाठा, पाण्याची आवक आणि व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली चिंता आता कमी होत असून, जलाशयात सध्या सुमारे ८ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धुपदाळ जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून अतिरिक्त पाणी घटप्रभा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
या विसर्गामुळे बेळगाव ते बागलकोट दरम्यान नदीचा प्रवाह सुधारला असून बागलकोट जिल्ह्यापर्यंत पाणी पोहोचल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून रविवारी सकाळपासून घटप्रभा डाव्या कालव्यात १,००० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत हा विसर्ग २,००० क्यूसेक करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
पुढील काळात पावसाचे स्वरूप कसे राहील याबाबत निश्चित अंदाज देता येत नसल्याने उपलब्ध पाण्याचा जपून आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जलाशयातील पाण्याची पातळी आणि आवक यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
