बेळगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; दहावीनंतरच्या करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
बेळगाव :
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने (कै. आशीर्वाद रमेश सावंत यांच्या स्मरणार्थ) दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सीमा लढ्यात हुतात्मा झालेल्या वीरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्त्या म्हणून वकील व प्राध्यापक सरिता सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेताना आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे. तसेच स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देऊन भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. सरिता पाटील यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूरचे अध्यक्ष गोपाल देसाई, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस यूनिस मालोजीराव अष्टेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अंकुश केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला.
