सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे : राहुल जारकीहोळी
बेळगाव : सहकारी बँकांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ठेवीदारांचा विश्वास जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत बीडीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
बेलगाव येथील बीडीसीसी बँकेच्या सभागृहात कर्नाटक राज्य सहकार महासंघ आणि बेलगाव जिल्हा सहकारी युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पतसंस्था आणि कर्मचारी पतसंस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
राहुल जारकीहोळी म्हणाले की, सहकारी बँकांमध्ये नागरिकांनी ठेवलेल्या ठेवी सुरक्षित राखणे आणि गरजेच्या वेळी त्यांची परतफेड करणे ही प्रत्येक संस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे. पारदर्शक आणि जबाबदार कारभारातून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची आवश्यकता असून, त्यामुळे सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.
यावेळी बेलगाव विभागाचे सहकारी संस्थांचे संयुक्त निबंधक कल्लप्पा ओबण्णगोळ यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना बँकिंग व्यवहार, कर्जवाटप, व्याजदर व्यवस्थापन आणि नियमन यासाठी सातत्याने प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. "ठेवीदार हेच आपल्या संस्थांचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या पैशाचा जबाबदारीने वापर करून सहकारी क्षेत्राची प्रगती साधली पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.
कर्नाटक राज्य पतसंस्था महासंघाचे संचालक संजय होसमठ यांनी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नियमांचे पालन करूनच करावेत, असे सांगत सहकारी संस्थांनी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कायम राखणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
या प्रशिक्षणात निवृत्त सहकार विभागाचे अपर निबंधक डॉ. गुरुस्वामी आणि संयुक्त निबंधक कल्लप्पा ओबण्णगोळ यांनी सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा सहकारी युनियनचे अध्यक्ष बसगौडा पाटील, उपनिबंधक रवींद्र पाटील, हाळप्पा जग्गीणवर, उमेश बाळी, तम्मण्णा केंचरेड्डी, जबीउल्ला काझी, बीडीसीसी बँकेचे सीईओ एन. बी. कलावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
