कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरू सेनेच्या वतीने मंगळवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकरी हुतात्मा दिन श्रद्धापूर्वक पाळण्यात आला. यावेळी ऊस कांड्यांचे पूजन करून शेतकरी आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी शेतकरी चळवळीचा इतिहास आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित लढा हाच प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी नरगुंद आणि नवलगुंद येथील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत, तत्कालीन सरकारच्या काळात झालेल्या पोलिस गोळीबारात दोन शेतकरी सत्याग्रहींना प्राण गमवावे लागले होते, ही घटना शेतकरी चळवळीच्या इतिहासातील वेदनादायी अध्याय असल्याचे सांगितले. आजही शेतकऱ्यांना विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करत शेतकरी हिताच्या प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
