आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकरी माऊलींच्या सेवेसाठी बेळगावच्या वन टच फाऊंडेशनने राबविलेला सेवाभावी उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. "एक हात मदतीचा, समाजसेवेचा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना पाणी, केळी, शीतपेये आणि बिस्किटांचे वाटप केले.
या उपक्रमासाठी हॉटेल विराटचे मालक व समाजसेवक कपिल भोसले यांनी 20 बॉक्स पाण्याच्या बाटल्या, विनायक कांगले यांनी 1,000 केळी व शीतपेये, नगरसेवक राजू भातकांडे, सूर्यकांत हेब्बाळकर, Extreme Security Solutionचे प्रमुख इंद्रजित प्रधान यांनी 250 लिंबू शीतपेय पाकिटे, तर फेसबुक फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष व समाजसेवक संतोष दरेकर यांनी दोन बॉक्स बिस्किटे देऊन सहकार्य केले.
वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष, समाजसेवक व कलाकार विठ्ठल फोंडू पाटील यांनी स्वतःचे चारचाकी वाहन उपलब्ध करून देत या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यासोबत फाऊंडेशनचे सदस्य नारायण कांगले, राजू मनगुतकर आणि रवींद्र पाटील यांनीही वारकऱ्यांची सेवा केली.
बेळगावपासून सुमारे २५ किलोमीटरपर्यंत निलजी गावाच्या दिंडीत सहभागी होत कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजन-कीर्तन आणि विठ्ठलनामाचा जयघोष करत पायी प्रवास केला. वाटेत ज्या-ज्या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिंड्या भेटल्या, तेथे "राम कृष्ण हरी... माऊली... माऊली..." असा गजर करत आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सेवेचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भावनिक वातावरणात कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांचा निरोप घेतला. वारकरी माऊलींनी या निस्वार्थ सेवेसाठी सर्व दात्यांचे आणि वन टच फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले.
