बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काँग्रेस सरकारविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेले अनिश्चितकालीन अहोरात्र धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. कथित वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी भाजपने आंदोलन छेडले आहे.
धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील आणि भाजप नेते एम. बी. जिरली यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका करत विविध मागण्या मांडल्या.
वाल्मिकी विकास महामंडळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या तत्कालीन मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा केली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक मदत आणि नुकसानभरपाई मिळावी, यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
भाजपने सुरू केलेल्या या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून, सरकारविरोधात घोषणाबाजी करत मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, महानगर अध्यक्ष गीता सुतार, बसवराज साणिकोप्प, प्रमोद कोचेरी, धनश्री देसाई, मल्लाप्प मारिहाळ, युवराज जाधव, यल्लेश कोलकार, धनंजय जाधव, संतोष देशनूर, युवराज कदम, चेतन अंगडी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
