राज्य सरकारच्या कृषी धोरणांचा निषेध आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने बेळगावातील चन्नम्मा चौकात चाबूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले.
आंदोलनादरम्यान माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी पावसाअभावी राज्यातील, विशेषतः बेळगाव जिल्ह्यातील, शेती मोठ्या संकटात सापडल्याचा दावा केला. अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी धरणांमधील पाणीसाठा, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या ऊसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
माजी आमदार संजय पाटील यांनी सरकारवर टीका करत ग्रामीण भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. विकासकामांपेक्षा राजकीय घडामोडींना प्राधान्य दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच जमीन संपादनाविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांसाठी तातडीने आर्थिक भरपाई जाहीर करावी आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
