बेळगाव :
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या मानाच्या अश्वांचा आळंदीच्या दिशेने पवित्र प्रवास सुरू झाला. माऊलींचा अश्व मोती आणि जरीपटक्याचा अश्व हिरा हे दोन्ही मानाचे अश्व तब्बल ३०० किलोमीटरचा प्रवास करत आळंदीकडे रवाना झाले.
अंकली येथील शितोळे घराण्याकडे गेल्या १९४ वर्षांपासून माऊलींच्या अश्वसेवेची परंपरा जपली जात आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीतील पालखी सोहळ्यासाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्व दरवर्षी अंकलीहून प्रस्थान करतात.
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व मिळवून देण्यात हैबतबाबा आरफळकर यांचे योगदान मोठे मानले जाते. त्यानंतर माऊलींच्या अश्वांचा आणि तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. ही परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार आणि त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार निष्ठेने पुढे नेत आहेत.
अंकली येथील शितोळे राजवाड्यात सकाळी अंबाबाई मंदिरात अश्वपूजन, आरती आणि जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार आणि विहानराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते दोन्ही अश्वांचे पूजन करण्यात आले.
दिंडीसह दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली आणि दर्शन घेतले. पारंपरिक मार्गाने मिरवणूक गावच्या वेशीपर्यंत पोहोचल्यानंतर भाविकांनी अश्वांना भावपूर्ण निरोप दिला.
या सोहळ्यास विविध मान्यवर, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्वसेवेची जबाबदारी तुकाराम कोळी आणि अक्षय परीट हे सांभाळणार आहेत.
