लोकमान्य टिळक पुण्यतिथी : बेळगावात किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन
बेळगाव | प्रतिनिधी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (१ ऑगस्ट) बेळगावातील टिळक चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना किरण जाधव यांनी लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले योगदान अधोरेखित केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा विचार आजही देशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि समाजहिताची भावना बळकट करण्यासाठी टिळकांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ केली. तसेच 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्रांतून ब्रिटिश सत्तेविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत स्वातंत्र्यलढ्याला नवे बळ दिल्याचे यावेळी उपस्थितांनी स्मरण केले.
कार्यक्रमात राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी भाजप नेते राजन जाधव, टिळक चौक रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि लोकमान्य टिळकांच्या कार्याला उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.
