विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा तसेच लेखन व अभिव्यक्ती कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत ‘क्रांतीज्योती लेखक- वाचक संघा’चे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.
"वाचनामुळे ज्ञान वाढते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो किंबहुना माणसाला माणूस म्हणून खरी ओळख करून देण्याचं कामं वाचन करत त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे विविध प्रकारची पुस्तके वाचून वाचनाची सवय जोपासावी", असे आवाहन राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या, लोकमान्य बालग्रंथालयाच्या संयोजिका, लेखिका, समीक्षिका व कवयित्री शोभा नाईक यांनी ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती विद्यार्थी लेखक - वाचक संघांचे उदघाटक व प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वरा सावंत हिने कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून प्रमुख पाहुण्या शोभा नाईक यांचा परिचय करून दिला व शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर वाचक-लेखक संघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी विद्यार्थी वाचक- लेखक संघाचे महत्त्व स्पष्ट केले. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपला विकास साधावा असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी लोकमान्य बालग्रंथालयाच्या वतीने शाळेला पुस्तक पेटी भेट देण्यात आली. या पुस्तक पेटीमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके सहज उपलब्ध होणार असून त्यांच्या वाचनाची गोडी वाढण्यास मदत होणार आहे.
लेखक- वाचक संघाच्या उपक्रमांतर्गत आदिती आजरेकर हिने थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावरील पुस्तकाचा, तर स्वरा सावंत हिने ‘तुलसीदास’ या पुस्तकाचा अल्प परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा सावंत हिने केले, तर श्रीकांत काटकर यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.









