बेळगाव : दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ गीताचा कथित अवमान झाल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगावमध्ये जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा चौक येथे भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेचा निषेध केला. भाजपच्या आरोपानुसार, दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ गीत सुरू असताना ते पूर्ण होण्यापूर्वीच कार्यक्रम थांबवण्यात आला. या प्रकारामुळे राष्ट्रगीतासमान राष्ट्रीय भावना असलेल्या गीताचा अवमान झाल्याचा आरोप भाजपने केला.
आंदोलनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष ईरन्ना अंगडी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महांतेश चिन्नप्पागौड्र, जिल्हा सरचिटणीस आनंद अत्तुगोळ, गुरु हिरेमठ, महानगराध्यक्ष महादेव धरेण्णवर यांच्यासह मुरुघेंद्रगौड पाटील, प्रशांत अम्मीनभावी, प्रसाद देवरमनी, दिग्विजय सिद्नाळ, कृष्णा पाटील, पंडित ओगले, बाबू पाटील, राजशेखर डोणी आणि भाजप युवा घटकाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
