आषाढी वारीनिमित्त गोव्यातील उस्ते-सत्तरी (वाळपई) येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे सुळगा (हिं.) येथे बुधवारी भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून दिवंगत सामाजिक कार्यकर्ते स्व. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा त्यांच्या कुटुंबीयांनी सलग पाचव्या वर्षीही जपली.
बेळगाव–वेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या स्वागत सोहळ्यास रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सर्व वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. पावसाने विश्रांती दिल्याने वारकऱ्यांनी आनंदाने या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी वारकरी विद्येश माडकर यांनी दिंडीची माहिती देताना सांगितले की, उस्ते येथून खांद्यावर पालखी घेऊन पंढरपूरपर्यंत पायी जाण्याची ही मंडळाची सलग पाचवी वारी असून यंदा १५३ वारकरी सहभागी झाले आहेत. दिंडीचे प्रमुख बारकेलो राणे (बुवा), उपप्रमुख सर्वेश राणे, संचालक रामकृष्ण इब्रामपूरकर आणि सचिव मोहन वांतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
सुळगा ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविकात शेखर मनोहर पाटील यांनी स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, "वारकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वरसेवा" या भावनेतून त्यांनी सुरू केलेला उपक्रम आजही त्यांच्या कुटुंबीयांकडून तितक्याच श्रद्धेने पुढे नेला जात असल्याचे सांगितले.
माधुरी जाधव यांनी मनोगतात स्व. शट्टूप्पा पाटील यांनी दिलेले सेवाभावाचे संस्कार भविष्यातही जपण्याचा निर्धार व्यक्त केला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून ही परंपरा अखंड सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सुळगा ग्रामस्थांसह अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी भरत पाटील यांनी वारकरी परंपरेतील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित करत दिंडीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीप्रमाणे केलेल्या स्वागत व सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिंडीच्या वतीने रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
