मुंबई : शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशभरात वेगळी ओळख निर्माण करणारे पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाचा प्रसार हे ध्येय ठेवून १९८३ मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत त्यांनी शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभे केले. आज डी. वाय. पाटील समूहा अंतर्गत विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि इतर उच्च शिक्षण संस्था कार्यरत आहेत.
शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुणे, कोल्हापूर आणि नवी मुंबई येथील शैक्षणिक संकुले देशातील अग्रगण्य संस्थांमध्ये गणली जातात.
सार्वजनिक जीवनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविले होते.
'शिक्षणसम्राट' आणि 'दादा' या नावाने सर्वपरिचित असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षणविश्वातील एक दूरदृष्टीचा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
