*शिनोळी येथे ‘स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनात कसा वाढवावा’ या विषयावर प्रा.जॉर्ज क्रूझ यांचे सखोल मार्गदर्शन*
शिनोळी, (रवी पाटील ) दि.9 – शिनोळी येथील समाज मंदिर येथे *’शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन कसा वाढवावा’* या विषयावर एक सखोल मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते *प्रा. जॉर्ज क्रूझ* यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्व, पालकांची भूमिका आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यावर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे *अध्यक्ष शिनोळी बु. ग्रामपंचायतचे सरपंच गणपत कांबळे* होते.
प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनातच वाढवण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच आपला अभ्यास नियमित व व्यवस्थित ठेवावा, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या विविध कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा, आत्मविश्वास, आणि तर्कशक्ती वाढवून अभ्यासात सातत्य ठेवावे. शालेय जीवनातच चांगले शैक्षणिक पाया मजबूत केल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे जाते.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक मनोवैज्ञानिक म्हणून हाताळावे, त्यांच्या शैक्षणिक व मानसिक अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढावा, असे प्रा. क्रूझ यांनी सांगितले. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.
पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तसेच मुलांच्या आवडी-निवडींचा आदर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा दीर्घकालीन असतो, त्यामुळे पालकांनी मुलांना नियमित अभ्यास करण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे.
प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी *छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. या महान विभूतींनी शिक्षणासाठी योगदान मोठे होते त्यामुळे समाजातील बदल घडवून आला. विद्यार्थ्यांनीही या महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच पुंडलिक गवसेकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन नारायण पाटील, नामदेव बोकमूरकर राजर्षी शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.टी. भाटे, विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आप्पाराव पाटील,अध्यापक रवी पाटील, सुभाषचंद्र सावंत , संजय काळे , सुभाष कदम , विक्रम तुडयेकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश मारुती गावडे, उपाध्यक्ष यशवंत डागेकर, सुजाता सुमित डागेकर, सावता बामुचे , दामोदर बोकमूरकर, प्राथमिक शाळा अध्यक्ष नारायण बेळगावकर, अध्यापिका मनिषा पावशे व चंदा घसारी मॅडम तसेच राजर्षी शाहू विद्यालय आणि विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच गणपत कांबळे यांच्या हस्ते प्रा. जॉर्ज क्रूझ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद गावडे यांनी केले.