बेळगाव : येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय हायस्कूलमध्ये हजेरी पुस्तक तपासण्याच्या कारणावरून विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यावर झालेल्या कथित मारहाण प्रकरणाचा तब्बल १३ वर्षांनंतर निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी प्रकाश परशुरामभाऊ नंदिहळ्ळी आणि सुहास प्रकाश हुद्दार यांची दुसरे जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळून आलेल्या विसंगती तसेच अभियोजन पक्षाकडून आवश्यक बाबी ठोसपणे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना दिलासा दिला.
८ जुलै २०१३ रोजी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास विजय नंदिहळ्ळी हे येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय हायस्कूलमध्ये गेले होते. हजेरी पुस्तकाची पाहणी करत असताना त्यांच्याशी अटेंडर प्रकाश नंदिहळ्ळी यांचा वाद झाला. हजेरी पुस्तक तपासण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.
यानंतर विजय नंदिहळ्ळी यांचा मुलगा सागर हा शाळेत पोहोचला. त्यावेळी आणखी काही व्यक्तींना शाळेत बोलावून घेण्यात आल्याचा आणि शाळेचा दरवाजा तोडून विजय व सागर यांच्यावर लोखंडी रॉड व दांड्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
या घटनेत पिता-पुत्र जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. तसेच पुन्हा शाळेत आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता.
ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेनंतर विजय नंदिहळ्ळी यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर दुसरे जेएमएफसी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.
या प्रकरणात सुरुवातीला चार जणांविरोधात कारवाई करण्यात आली होती. मात्र, अरुण नंदिहळ्ळी आणि मोईन पठाण यांचे सुनावणीदरम्यान निधन झाल्याने उर्वरित प्रकाश नंदिहळ्ळी आणि सुहास हुद्दार यांच्याविरोधातील खटला पुढे सुरू राहिला.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा
बचाव पक्षातर्फे अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरविता येत नाही, तसेच आरोपींविरोधातील आरोप ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी मांडले.
फिर्यादी हे विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष असल्याचे सिद्ध करणारा आवश्यक पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नसल्याचाही मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला. तसेच साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याने अभियोजन पक्षाचा दावा संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
संपूर्ण पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषमुक्त केले. तब्बल १३ वर्षे चाललेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे.
