बेळगाव :बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) शेठ यांनी केएचबी कॉलनी, बसवण कुडची, तहसीलदार गल्ली आणि बहादूर गल्ली परिसराला भेट देत जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी जनसुनावणी (जनता दरबार) आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या जनता दरबारात नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था, गटारींची समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि इतर नागरी सुविधांबाबतच्या अडचणी आमदारांसमोर मांडल्या.
नागरिकांच्या तक्रारी ऐकून आमदार आसिफ (राजू) शेठ यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना आमदारांनी सांगितले की, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेणे हे प्रभावी प्रशासनासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक भागातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळणे आवश्यक असून, जनता दरबाराच्या माध्यमातून विकासकामांना स्थानिक गरजेनुसार दिशा मिळते.
परिसरातील नागरिकांनी आमदारांनी स्वतः भेट देऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रलंबित प्रश्नांवर लवकर कार्यवाही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी स्थानिक नेते, नगरसेवक, नागरिक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
