बेळगांव:महानगरपालिकेतून एल अँड टीकडे वर्ग करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक देण्यात आलेल्या नोटिशीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात असून वेतनासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत कंपनीकडून ३१ मेपर्यंतच सेवा सुरू राहतील, असा तातडीचा आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही कर्मचारी तब्बल २८ वर्षांपासून काम करत असल्याने अचानक आलेला हा निर्णय त्यांच्या दृष्टीने धक्कादायक मानला जात आहे.
सध्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या तातडीच्या धोक्यात आल्या असून जवळपास ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. सुरुवातीला या प्रकल्पांतर्गत ३७५ पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. कालांतराने काहींचे निधन झाले, तर काही कर्मचारी वयोमर्यादा ओलांडल्याने सेवेतून बाहेर पडले. आता जवळपास ३०० कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नियमांनुसार प्रकल्प संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा महानगरपालिकेकडे वर्ग करणे अपेक्षित होते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे अनेक कुटुंबांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पालकांच्या औषधोपचारांचा खर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा, याबाबत कर्मचारी चिंतेत आहेत.
दरम्यान, काही नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. विशेषतः काही अधिकारी वर्गातील नातेवाईक आणि राजकीय शिफारशीवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप होत असून यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावित कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुढील आंदोलन आणि भूमिका ठरवण्यासाठी कर्मचारी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी दलीत नेते मल्लेश चौगुले,सुब्रमण्यम (सुबू) कांबळे, संदीप कोलकर यांच्यासहित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

