‘माय’ आणि ‘लढा’ कवितांतून सीमावेदनेचा आक्रोश; बेळगाव कवींच्या सादरीकरणाने रसिक भारावले
धाराशिव : स्वागताध्यक्ष आमदार कैलासदादा पाटील यांनी सीमाप्रश्नाबाबत ठाम भूमिका मांडताना सांगितले की, "सीमाभागातील मराठी बांधवांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे. मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. सीमावासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे." त्यांनी सीमाभागातील मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाहीही दिली.
अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २०२६ साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा जागर करणाऱ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागताध्यक्ष आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या संमेलनात मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांचा संगम अनुभवायला मिळाला.
संमेलनाच्या अखेरच्या सत्रातील काव्यमैफलीने विशेष रंगत आणली. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी आपल्या ओघवत्या, रसाळ आणि बहारदार सूत्रसंचालनातून संपूर्ण मैफलीला वेगळी उंची प्राप्त करून दिली. चारोळ्या, विनोदी टिपण्या आणि आशयघन निवेदनातून त्यांनी काव्याची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली. "कवीच्या लेखणीत समाजपरिवर्तनाची ताकद असते. एखादी प्रभावी कविता अनेक ग्रंथांइतका परिणाम घडवू शकते," असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषद, कर्नाटक राज्य शाखेच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील १२ आणि बिदर जिल्ह्यातील ५ कवी-कवयित्रींनी सहभाग नोंदवून सीमाभागातील मराठी माणसांच्या भावना, वेदना, संघर्ष आणि अस्मितेचा आवाज धाराशिवच्या भूमीत पोहोचविला.
अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष तथा सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सादर केलेल्या ‘माय’ आणि ‘लढा’ या कवितांनी काव्यमैफलीचा केंद्रबिंदू ठरल्या. ‘माय’ कवितेत महाराष्ट्र ही माय आणि बेळगाव हे तिच्यापासून दूर गेलेले लेकरू अशी हृदयस्पर्शी प्रतिमा उभी राहत सीमाभागातील मराठी माणसांच्या सात दशकांच्या वेदनांना शब्द मिळाले. तर ‘लढा’ कवितेत सीमावासीयांच्या न्याय, स्वाभिमान आणि अस्मितेसाठी सुरू असलेल्या संघर्षाचा बुलंद हुंकार उमटला. या कवितांनी सभागृहातील रसिकांच्या मनाला चटका लावत टाळ्यांचा कडकडाट मिळविला.
काव्यमैफलीत किरण पाटील यांनी ‘एक पणती पुरेशी’, रोशनी हुंद्रे यांनी ‘देवदासी’ व ‘ना ती आणि ना तो’, अपर्णा पाटील यांनी ‘लग्नाचे गांभीर्य’, संजीवनी खंडागळे यांनी ‘एकच प्याला’, स्मिता आळतेकर यांनी ‘पुकारा’, अशोक सुतार यांनी ‘शाकाहारी की मांसाहारी’, चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘भाकरीचा चंद्र’, पूजा सुतार यांनी ‘शंभूराजे’ व ‘आयुष्याची गरिबी’, मनीषा नाडगौडा यांनी ‘दरवाढ’ व ‘जुळवू धागा सुखाचा’, तर स्नेहल बर्डे यांनी ‘मैत्री’ या कविता सादर करून विविध सामाजिक विषयांवर प्रभावी भाष्य केले.
सीमाभागातील कवी-कवयित्रींच्या प्रभावी सादरीकरणामुळे धाराशिवच्या साहित्यनगरीत मराठी अस्मितेचा जागर झाला. सीमावासीयांच्या वेदना, संघर्ष, स्वाभिमान आणि न्यायाच्या लढ्याचा हुंकार कवितांमधून घुमला आणि साहित्य हे समाजमन जागविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
