बेळगावातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत कन्नड संघटनांचे नेते Vatal Nagaraj यांनी महाजन अहवालाच्या समर्थनार्थ बेळगाव महानगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत संगोळी रायण्णा चौकात आंदोलकांना रोखले आणि वाटाळ नागराज यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत वाटाळ नागराज यांनी महाजन अहवाल अंतिम मानण्याची मागणी करत महानगरपालिकेला २ जूनपर्यंत अल्टिमेटम दिला. ठराव मंजूर न झाल्यास राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या हलमिडी शिलालेखाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून कन्नड संघटनांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेने महाजन अहवालासंदर्भात ठराव मंजूर करावा, अन्यथा राज्य सरकारने महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा महानगरपालिकेकडे निघाला असताना पोलिसांनी संगोळी रायण्णा चौकात अडवला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही महिला आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला.
सीमाभागात पुन्हा एकदा भाषा आणि सीमा प्रश्नावरून वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे. कन्नड संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठी भाषिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
या घडामोडींनंतर आता Maharashtra Ekikaran Samiti पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे सीमाभागातील मराठी जनतेचे लक्ष लागले आहे.
