बेळगांव : आश्रय कॉलनी आणि सह्याद्री नगर परिसरात जल जीवन मिशन (JJM) योजनेअंतर्गत नवीन पाणी कनेक्शन देण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठ्याची अपेक्षा असताना काही ठिकाणी जुन्या पाइपलाइनलाच नवीन नळजोडणी करण्यात येत असल्याची तक्रार समोर आली आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, योजनेचा मूळ उद्देश पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे हा आहे. त्यामुळे नवीन टाकण्यात आलेल्या पाइपलाइनशीच नवीन कनेक्शन जोडले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जुन्या पाइपलाइनमुळे भविष्यात पाणीपुरवठ्याच्या समस्या कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परिसरातील अनेक भागांमध्ये अद्याप वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नवीन योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि प्रत्येक घरापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
|
दरम्यान, काही भागांमध्ये नवीन पाइपलाइनसोबतच नवीन कनेक्शनची जोडणी करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित भागातही त्याच पद्धतीने काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
स्थानिकांनी संबंधित विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाची गुणवत्ता तपासावी आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली आहे.
