बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात वाढत्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने मोठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. एमएलआयआरसीचे कमांडंट व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर Girish Upadhya यांच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी Sudam Vijay Manchalwar यांनी मंगळवार पहाटेपासून विशेष ‘प्लास्टिक वेस्ट क्लिअरन्स ड्राइव्ह’ सुरू केली.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा झाल्यानंतर ही मोहीम तातडीने राबवण्यात आली. दररोज घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या 84 सफाई कर्मचाऱ्यांना या विशेष मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले. सकाळपासूनच नाले, गटारे, मोकळी मैदाने, रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील घाण हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान सुमारे एक टन प्लास्टिक व इतर कचरा हटवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे बोगारवेस नाल्याजवळ वैद्यकीय कचरा टाकलेला आढळून आला. तसेच हॉटेलमधील अन्नकचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून उघड्या जागेत फेकण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले.
प्रशासनाच्या पाहणीत कॅम्प परिसरातील चंगड बस स्टॉपपासून गणेशपूर आणि हिंडलगा रोडकडे जाणाऱ्या मार्गांवर बाहेरील काही व्यक्तींकडून बेकायदेशीरपणे कचरा टाकला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले आणि गटारे तुंबून पाणी साचते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, टायफॉईडसारख्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढतो. याशिवाय प्लास्टिक जाळल्याने निर्माण होणारा विषारी धूर नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
दरम्यान, काही नागरिकांनी घरांसमोर लोखंडी शेड व अन्य अतिक्रमणे करून रस्ते अडवल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि स्वच्छता वाहने आत जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अशा अनधिकृत अतिक्रमणांवर कठोर कारवाईचा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डाने दिला आहे.
कचरा रस्त्यावर, मैदानात किंवा नाल्यात न टाकता तो थेट कचरा संकलन वाहनांनाच द्यावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. “स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असा संदेशही यावेळी देण्यात आला.
कॅन्टोन्मेंट परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि हरित ठेवण्यासाठी ही मोहीम पुढील काळातही नियमित सुरू राहणार असल्याचे बोर्ड प्रशासनाने स्पष्ट केले.
