बेळगाव : दावणगिरी जिल्ह्यातील होदेगिरी येथे असलेल्या राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळाच्या विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समाधी परिसराची झालेली दुरवस्था दूर करून तातडीने संवर्धनाचे काम हाती घ्यावे, अन्यथा देशभर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा इतिहास अभ्यासक व सामाजिक संघटनांनी दिला आहे.
बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मावळा जवान संस्था आणि अखिल भारतीय छत्रपती शिवाजी महाराज क्षेत्रीय मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका मांडली.
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी सांगितले की, शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाकडे शासनाचे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले असून वास्तूची अवस्था चिंताजनक बनली आहे. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या स्मारकाच्या देखभाल-दुरुस्तीला आवश्यक परवानग्या मिळत नसल्याने विकासकामे रखडली आहेत.
होदेगिरी येथे मोहिमेदरम्यान शहाजीराजे भोसले यांचे निधन झाले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजीराजे भोसले यांनी त्या ठिकाणी समाधी उभारली. पुढील काळात स्थानिक मराठा समाजाच्या प्रयत्नांमुळे हे ऐतिहासिक स्थळ जनतेपर्यंत पोहोचले.
स्वातंत्र्यानंतर समाधीला संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात आवश्यक सुविधा, संवर्धन आणि स्मारक विकासाची कामे अपेक्षित पातळीवर झाली नसल्याचा आरोप करण्यात आला.
उन्हा-पावसामुळे समाधीच्या दगडी बांधकामावर परिणाम होत असून स्मारकाचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक सरकारकडून विकासासाठी निधी मंजूर होऊनही पुरातत्त्व विभागाच्या परवानग्यांअभावी तो वापरता येत नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने स्वतः पुढाकार घेऊन समाधीचा विकास करावा किंवा परिसर कर्नाटक सरकारकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी करण्यात आली.
मागणी मान्य न झाल्यास देशभरातील शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींना सोबत घेऊन व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
पत्रकार परिषदेला शंकरराव निवंगुणे, शिवाचार्य स्वामी सुनील जंगम, रोहित नलावडे, हनुमंत दिघे, अण्णोजीराव नलावडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
