बेळगाव : बेळगाव शहरात 'श्री गणेश फेस्टिव्हल २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 'फ्री हॅण्ड' रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांनी एकाहून एक सुंदर रांगोळ्यांमधून समाज प्रबोधनाचा संदेशही दिलेला पाहायला मिळाला.दोन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत कविता गांगुर आणि अर्पिता रायकर विजेत्या ठरल्या.
श्री भक्ती महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., श्री राजमाता महिला मल्टिपर्पज सोसायटी लि., श्रीमाता को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आणि ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गणेश फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी विशेष पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यानंतल आज सोमवारी फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेत 'फ्री हॅण्ड' रांगोळी स्पर्धा (२.५ x २.५ फूट) पार पडेल. ही स्पर्धा १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील अशा दोन गटांत पार पडल्या.स्पर्धेकांना रांगोळी काढण्यासाठी एक तास देण्यात आला होता. सहभागी स्पर्धकांनी पारंपारिक पद्धतीच्या रांगोळ्यांसह निसर्ग, फुले, पक्षी, देवी देवता याचबरोबरच समाज प्रबोधनात्मक सोशल मीडियाचा अतिरेक टाळा, ध्वनी आणि जल प्रदूषण रोखा, नशा मुक्ती तसेच बेटी बचाव बेटी पढाव या विषयांवर आकर्षक रांगोळी रेखाटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेसाठी श्रीकृष्ण अंसुरकर आणि प्रतिभा निघून यांनी परीक्षकाचे काम पाहिले.
रांगोळी स्पर्धेत 18 वर्षावरील गटात कविता गांगुर (प्रथम), शुभांगी कुरंगे (द्वितीय),लक्ष्मी घोडके (तृतीय) तसेच ज्योती पटेल, सौम्या बैकेरीकर आणि संचिता बाईकरीकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. अठरा वर्षाखालील गटात अर्पिता रायकर (प्रथम), प्राजक्ता घोटणकर (द्वितीय), सौम्या तावरे (तृतीय) तसेच सिया शेठ लावण्या तावरे यांना उत्तेजनार्थ राजमाता सोसायटीच्या चेअरमन मनोरमा देसाई भक्ती सोसायटीच्या चेअरमन ज्योती अग्रवाल यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित संचालक मंडळाच्या वतीने श्री गणेशाची आरती करण्यात आली. ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनी यावेळी नृत्य आणि गीते सादर करुन सर्वांची मने जिंकली.
उद्या मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता न्यू गुड्सशेड रोड येथील श्रीमाता सोसायटी सभागृहात नक्षत्र ग्रुप प्रस्तुत 'मंगळागौर' आणि सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सर्व नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
