बेळगाव :
देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी ऊन, वारा, पाऊस आणि विविध प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेने एक प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. ‘पहिली राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या राख्या भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या आहेत.
बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या. या राख्यांवर सैनिकांसाठी प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारे भावनिक संदेशही विद्यार्थ्यांनी लिहिले आहेत.
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर आपल्या हाताने तयार केलेली राखी बांधली जाणार असल्याची भावना विद्यार्थ्यांसाठी विशेष उत्साहाची ठरली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ रक्षाबंधनाचा सण साजरा केला नाही, तर सैनिकांबद्दलचा आदर आणि देशप्रेमाची भावनाही व्यक्त केली.
“तुम्ही देशाचे रक्षण करता, म्हणून आम्ही निर्धास्त आहोत; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” हा संदेश या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या राख्यांमधून जवानांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
या राख्या केवळ सणाच्या निमित्ताने पाठविलेले धागे नसून, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या वीर जवानांसाठी प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचा संदेश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘आधार सोशल ट्रस्ट, पुणे’ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातील राख्या राजस्थानमधील बिकानेर परिसरात तैनात असलेल्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले तसेच शिक्षक, विद्यार्थी, स्नेहल पोटे आणि मुक्ता आलगोंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
