बेळगाव : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गो-हत्त्या बंदी कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात बेळगाव जिल्ह्यात गाईंची तस्करी आणि बेकायदेशीर गो-हत्यांच्या घटना सातत्याने समोर येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्नाटक पशु हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा २०२० अस्तित्वात असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात हिंदू समाजात गायीला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष स्थान असल्याचे नमूद करत गो-हत्येमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हटले आहे. तसेच गोपालन आणि गोसंवर्धनासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून विशेष योजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गो-मांस विक्री आणि गाईंच्या वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि संबंधित यंत्रणांना गो-हत्त्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली.
निवेदन सादर करताना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

