सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध तसेच 'नीट' वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीसाठी बेळगावातील विविध पुरोगामी संघटनांनी सोमवारी भव्य पादयात्रा काढली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली ही पादयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान राजू टोपणावर यांनी 'नीट' परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप केला. अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
शिवाजीराव कागणीकर यांनीही 'नीट' परीक्षेसंदर्भातील वादग्रस्त घटनांनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका मांडली. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता आणि नैराश्य निर्माण होऊ नये यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आंदोलकांनी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी त्यांना अटक करण्यात आल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता टिकविणे आणि सर्व घटकांना समान संधी मिळावी, यासाठी शासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
