यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाने नियोजनाच्या कामांना सुरुवात केली असून, उत्सव सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत.
महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या १२ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, सरचिटणीस महादेव पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, तसेच सुनील बोकडे, सागर पाटील, बाळू जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महामंडळाने सर्व संबंधित विभागांची संयुक्त नियोजन बैठक तातडीने घेण्याची मागणी केली आहे. या बैठकीत सुरक्षा, वाहतूक, वीजपुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन सेवा तसेच गणेश मंडळांच्या अडचणींवर चर्चा करून आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
महामंडळाच्या प्रमुख मागण्या
१ सप्टेंबरपासून सिंगल विंडो परवानगी व्यवस्था सुरू करणे.
शहरातील विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.
उत्सवापूर्वी खराब रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करणे.
विसर्जन मार्गांसह शहरात स्वच्छतेची विशेष व्यवस्था.
सुरक्षित व अखंड वीजपुरवठा तसेच धोकादायक वीजतारा हटविणे.
सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रण, अग्निशमन, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा.
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विमा संरक्षण आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन.
सरचिटणीस महादेव पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही निवेदनाची सकारात्मक दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनाही निवेदन देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच १ सप्टेंबरपासून सिंगल विंडो प्रणाली सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, उत्सवाच्या सुरक्षा आणि नियोजनाबाबत पोलीस प्रशासनासोबतही स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे.
