बेळगाव-खानापूरमध्ये उद्या शाळांना सुट्टी; मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मंगळवार, 7 जुलै रोजी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच इयत्ता बारावीपर्यंतची सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केले आहेत.
सततच्या पावसामुळे दोन्ही तालुक्यांतील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ओढे आणि नाले भरून वाहत असून, सखल भागात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सुट्टी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद खानापूर तालुक्यात झाली असून, अनेक ठिकाणी नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बेळगाव शहरासह तालुक्यातही दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच पालकांनी मुलांना विनाकारण घराबाहेर न पाठवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
