बेळगाव : मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.
बैठकीनंतर डी मिडियाशी बोलताना अभय पाटील यांनी मतदार यादीतील त्रुटी आणि प्रलंबित बाबी तातडीने दुरुस्त करून यादी अंतिम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.
“कोणत्याही राजकीय पक्षाचा, भाषा, जात किंवा धर्माचा विचार न करता प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
दक्षिण मतदारसंघात इतर मतदारसंघातील मतदारांची नावे समाविष्ट केली जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचा दावा करत, याबाबत अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करावे, अशी सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार यादीतून सुमारे ३० हजार मतदार बाहेर असल्याची माहिती समोर आली असून, त्यांची पडताळणी करून आवश्यक सुधारणा लवकरात लवकर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राज्यातील काँग्रेस सरकारच्या हमी योजनांवरही अभय पाटील यांनी टीका केली. निवडणुकीच्या काळात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी आता का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गृहलक्ष्मी योजनेतील दरमहा मिळणाऱ्या २ हजार रुपयांच्या मदतीबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
“जर सरकारने हमी योजना जाहीर केल्या असतील तर त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत. जनतेच्या प्रश्नांसाठी भाजप सातत्याने आवाज उठवत राहील,” असे अभय पाटील यांनी सांगितले.
